'लव्ह जिहाद' हा भाजपानिर्मित शब्द; मुख्यमंत्री गेहलोत यांची टीका
दिल्ली l Delhi
उत्तर प्रदेश, हरयाणा, कर्नाटक यांसारख्या भाजपशासित राज्ये सध्या 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा आणण्याच्या तयारीत आहेत. यावरून राजस्थानचे मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी भाजपावर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करत भाजपावर जोरदार टीका केली आहे.
गेहलोत यांनी म्हंटले आहे की, "'देशाला विभागण्यासाठी आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्यासाठी 'लव्ह जिहाद' या शब्दाची निर्मिती भाजपद्वारे करण्यात आलीय. अशा घटनांवर अंकुश लावण्यासाठी कायदा आणणं हे असंविधानिक आहे तसंच हा कायदादेखील न्यायालयात टीकणार नाही. प्रेमात जिहादला कोणतीही जागा नाही."
तसेच, भाजपकडून देशात असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय ज्यामध्ये सहमतीनं एकत्र येणाऱ्या सज्ञान व्यक्तींनाही सत्तेच्या दयेची याचना करावी लागेल. विवाह हा सर्वस्वी खासगी निर्णय आहे आणि हे त्यावरच अंकुश लावू इच्छितात. वैयक्तिक स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचाच हा प्रकार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
त्याच बरोबर "सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्याचा, सामाजिक तणाव वाढ करणं आणि संविधानिक प्रावधानांचं उल्लंघन करण्याचा हा भाजपचा एक कट दिसतोय. राज्य कोणत्याही आधारावर नागरिकांसोबत भेदभाव करत नाही." असेही त्यांनी म्हंटले आहे.
मध्य प्रदेश सरकार 'लव्ह जिहाद'विरोधात नवा कायदा आणणार आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात धर्मांतरे आणि लव्ह जिहादची वाढती प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने सरकार 'मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020' आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन कायद्यात जबरदस्तीने धर्मांतरासाठी पाच वर्षांपर्यंतची शिक्षा देण्यात येईल.