
दिल्ली | Delhi
लोकसभा सचिवालयाने (Lok Sabha secretariat) काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे.
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांच्या तक्रारीवरून लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना ही नोटीस पाठवली आहे.
अदाणी समूह प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. याच प्रकरणी आता राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदींबद्दल चुकीचे, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारे मुद्दे मांडल्याचा दावा भाजपच्या खासदारांकडून करण्यात आला होता.
त्यासंदर्भात भाजप खासदारांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. आता लोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार आणि वर्तणूक शाखेच्या उपसचिवानं राहुल गांधींना ईमेलवर नोटीस दिलं आहे. लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींना १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर टीका केली होती. हिंडेनबर्ग-अदानींच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत भाजप नेत्यांनी ही टिप्पणी निराधार ठरवत त्यांच्यावर हक्क भंगाचा आरोप केला आहे.
हिंडेनबर्ग अदानी प्रकरणाबाबत राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे निराधार असून ते पंतप्रधानांच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचे भाजपने म्हटले आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींनी केलेल्या अनेक टिप्पण्या लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले आहे.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन येतात आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक कंत्राटे अदानींच्या कंपन्यांना मिळतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशातील उद्योगजगत त्यांच्या विरोधात होते. त्या काळात अदानी मोदींच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा त्यांचे नाते स्थानिक होते, मग गुजरातव्यापी झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे नाते राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं होत.