पुणे -
राज्याचे ग्रामविकासमंत्री हसण मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर येथे केलेलं विधान अत्यंत हास्यास्पद असून, हा प्रकार केवळ राज्यपालांना बदनाम करण्यासाठी
केला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागांवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांकडून कोणाचे नाव या 12 जणांच्या यादीत आहेत, ही अद्याप गुलदस्त्यात आहे तर दररोज राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी कोणाला संधि मिळणार याबाबत अनेक नावांचीही चर्चा सुरू आहे. ही सुरू असतानाच राज्य सरकारकडून देण्यात येणार असलेल्या नावांबाबत राज्यपाल काय भूमिका घेतात याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, राज्याचे ग्रामविकासमंत्री हसण मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला होता.
आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या सांत्वनसाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलताना ही वक्तव्य केल्याचे मुश्रीफ म्हणाले. राज्यपालांचा राज्यकारभारात हस्तक्षेप सुरू आहे. संविधानाला न जुमानता जाऊन राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता.
दरम्यान, विनय कोरेंच्या आईचे निधन झाल्याने, त्या ठिकाणी मी सात्त्वनासाठी गेलो होतो, अशा ठिकाणी मी राज्यपाल नियुक्त १२ जागांचा विषय कसा बोलेऩ असे म्हटले आहे.