मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवा सेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवर भाष्य केलं. पोलिस दल इतके हिंसक कसे होऊ शकते? नक्कीच यामागे कोणाचा तरी हात असला पाहिजे. घरात घुसून महिलांना मारहाण करण्यात आली. आता पुन्हा चौकशीचं आश्वासन दिलं आहे. हा नुसता फार्स आहे. एक फुल, दोन हाफ यांना माहिती नाही का आंदोलन होणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील आंदोलकांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही, कुणाच्या तरी आदेशावरुन आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला असा आरोपही त्यांनी केला आहे. आम्ही काही केले नाही, जे झाले त्यांची सखोल चौकशी करणार असल्याचे हे सरकार सांगेल. इतके खोल जातील की पुन्हा वर येणारच नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना सर्व माहिती दिली जाते, मग यांना कसे माहिती नव्हते असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.