दिल्ली | Delhi
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला दक्षिण भारतात दुसरा मोठा झटका बसला आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री ए. के. अँटनी यांच्या मुलानंतर आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अलीकडेच किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. रेड्डी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित राजीनामा दिला होता. त्यानंतर आज रेड्डींनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांच्यानंतर किरणकुमार यांच्याकडं आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्री पद सोपवण्यात आलं होतं. मात्र, आंध्रच्या विभाजनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत ते दुर्लक्षित होते.
भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किरण कुमार रेड्डी म्हणाले, काँग्रेस पक्षाला सोडेन, याची कधीच कल्पना केली नव्हती. पण, एक म्हण आहे, ‘माझा राजा खूप हुशार आहे. तो स्वत: विचार करत नाही. आणि कोणाचा सल्लाही ऐकत नाही, असं किरण कुमार रेड्डी यांनी म्हटलं.
या पक्षप्रवेशानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की, किरण कुमार रेड्डी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य काँग्रेसमध्ये होते. काही काळापूर्वी मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी ते पंतप्रधान मोदींच्या कार्यामुळे प्रभावित झाले असल्याचे सांगितले. अखेर आज ते भाजपामध्ये दाखल झाले. किरण कुमार रेड्डी हे भ्रष्टाचाराविरुद्धच्या आमच्या लढाईला आणखी भक्कम करतील, कारण एक आमदार आणि मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा स्वच्छ होती.