
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल बोलले पाहिजे. पण काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र (Maharashtra) पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिला.....
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेत नाहीत, असा आरोप केला. मात्र चैत्यभूमीपासून अगदी जवळ राहत असूनही राज ठाकरे चैत्यभूमीवर आजवर का नाही गेले? शाहू-फुले आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? असा सवालही आव्हाड यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीविषयी राज यांनी भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना ऐतिहासिक दाखले आणि अभ्यासपूर्ण संदर्भ देऊन राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा प्रतिवाद केला.
तुम्हाला भोंग्यावर (Loudspeaker) बोलायचे असेल तर बोला. पण इतिहासाला हात घालू नका. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली. १८६९ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन समाधीस्थळी स्वच्छता केली. त्याची बातमी नारायण मेघजी लोखंडे यांनी दीनबंधू वर्तमानपत्रात छापून आणली होती.
फुलेंचा पत्रव्यवहार, शाहू महाराजांचा पत्रव्यवहार आजही आर्काईजमध्ये उपलब्ध आहे. फुलेंनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पहिली सभा घेतली होती, त्या सभेला करवीर संस्थानचे प्रमुख आबासाहेब घाटगे उपस्थित होते. आबासाहेबांनी त्यांचे अभियंते रायगडावर पाठवले देखील होते. मात्र सहा महिन्यातच त्यांचे निधन झाले. कालांतराने महात्मा फुलेंचेही निधन झाल्यामुळे ही मोहीम थांबली, असे आव्हाड यांनी सांगितले.
त्यानंतर १८९५ साली टिळकांनी हे काम हाती घेतले. त्यावेळचे सर्व संस्थानिकांना त्यांनी सोबत घेतले. लोकमान्य टिळक हे फक्त दोन वेळा रायगड किल्ल्यावर गेले होते, असे इतिहासात नमूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यांनी नाना फडणवीसांचे छायाचित्र सिंहासनावर ठेवल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे.
१९२० साली टिळकांचे निधन झाले, तोपर्यंत समाधीसाठी काहीही काम झाले नव्हते. त्यांनी समाधी जीर्णोद्धार समिती स्थापन केली होती, त्यासाठी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी ज्या बँकेत ठेवला होता, ती बँक बुडाल्याचे सांगितले गेले. समाधी जीर्णोद्धार समिती काम करत नसल्यामुळे १९२६ साली ब्रिटिशांनी समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम स्वतःकडे घेतले. या इतिहासावर मी कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.
वर्तमान इतिहासकारांनाही हे संदर्भ माहीत आहेत. इतिहास असा कुणाच्याही नावावर खपवता येत नाही. चुकीचा इतिहास सांगूनच आमचे वाटोळे केले. भारतात ज्यांनी खरोखर इतिहास लिहिला त्यांची खूप मोठी परंपरा आहे. अनेक ब्राह्मण लेखकांनी इतिहास लिहिला आहे, त्यावर आमचा आक्षेप नाही. पण पुरंदरेंनी इतिहास नाही, तर कांदबरी लिहिली आहे. कांदबरी इतिहास नसते. इतिहास हा जातीचा, धर्माचा नसतो, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
पुरंदरे यांच्या जातीवरुन राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, पवारसाहेबांनी कधीही जातीभेद केला नाही. कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या नावावरुन दिला जाणारा पुरस्कार सुरु करण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घेतला होता.
विरोधी पक्षात असतानाही पवारसाहेबांना अनेक साहित्य समेंलनाचे उद्घाटक म्हणून साहित्यिकांनी बोलावले होते. मग हे सर्व साहित्यिक विकले गेले होते का? एस.एम. जोशीपासून अनेक ब्राह्मण नेत्यांसोबत पवारसाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
पण मुद्दामहून अपप्रचार करुन महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान काही लोक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पुरंदरेंच्या साहित्याला ज्ञानपीठ का नाही मिळाला? किंवा ऐतिहासिक लिखाणाबद्दल त्यांना एकाही विद्यापीठाने डॉक्टरेट का नाही दिली? असे प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केले.