Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयशिंदे-फडणवीस सरकारचा समर्थक आमदारांना सांभाळण्यातच वेळ जात आहे - जयंत पाटील

शिंदे-फडणवीस सरकारचा समर्थक आमदारांना सांभाळण्यातच वेळ जात आहे – जयंत पाटील

पुणे |प्रतिनिधी| Pune

“राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला असून, कुठलाही नवीन प्रकल्प त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागण्याची शिंदे फडणवीस सरकारमध्ये इच्छाशक्ती नसताना राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेले प्रकल्प देखील यांना टिकवता आलेले नाही. केवळ त्यांच्या समर्थक आमदारांना सांभाळण्यातच त्यांचा वेळ जात असल्याची टीका, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

- Advertisement -

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहर तर्फे राज्यातील ईडी सरकारने पोलिस भरतीवर स्थगिती आणली, महाराष्ट्रात येणारे अनेक उद्योगधंदे गुजरातच्या घशात घालण्याचे काम सध्या चालू आहे.राज्यातील तरूणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा महाराष्ट्र विरोधी उद्योग चालवणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात नवी पेठ येथील लालबहादूर शास्त्री रस्ता याठिकाणी निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक अध्यक्ष किशोर कांबळे,युवक कार्याध्यक्ष मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर, रूपाली ठोबरे, वेणू शिंदे उपस्थित होते. “शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी करतात गुजराती चाकरी”, “द्या आमच्या रोजगाराची हमी, बंद करा गुजरातची गुलामी”, “पन्नास खोके महाराष्ट्राला धोके” अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

जयंत पाटील म्हणाले, “राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रातला युवक बेरोजगार केला आहे. राज्यात युवकांचे भवितव्य अधिक गडद होत असल्याने पालकांच्या पोटाला पीळ पडला आहे.  अनेक मोठमोठे उद्योग बाहेर पाठवले गेले , पोलीस भारतीचा बनाव करून युवक निराश झाला आहे.महाराष्ट्राचे पुढील भवितव्य अंधारात आहे याची खंत वाटते. राज्यातील सुशिक्षित तरुणवर्गास राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले असून लवकरात लवकर या सर्व भरत्या घेण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने आम्ही घेत आहोत”.

राज्यातील पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक आदी भागातील गुंतवणुकीचे मोठे प्रकल्प निर्माण झाले असते तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. राज्यातील नवतरुणांची, सुशिक्षतांची त्यामुळे निराशा झालेली आहे. त्याचप्रमाणे राज्याचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून तरुणांनी राज्य सरकारला या संदर्भात माफ करू नये. तरुणांनी ताकदीने राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात आवाज उठवावा आणि आंदोलन करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

महाराष्टाच्या हिताचे निर्णय घेण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात अनेक लोकांहिताचे प्रश्न आ वासून उभे आहेत. युवक बेरोजगारीने हंबरडा फोडत आहेत. आजपर्यंत आपला पोशिंदा राजा बळीराजा पूर्ण पणे कोलमडला आहे. लाखो आत्महत्या पहायला मिळत आहेत. या महाराष्ट्रातला युवक वर्ग बेरोजगारीने पिचला जात असून त्यांच्या हाताला काम देण्याचे धोरण सरकार कडे नाही.  हे चित्र बदलण्यात शिंदे सरकार कडे ठोस कुठलेही धोरण नाही” , असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या