जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या 57 नगरसेवकांपैकी 27 बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेशी हातमिळवणी केल्यामुळे भाजपला महापालिकेची सत्ता गमवावी लागली.
नुकत्याच झालेल्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत त्या 27 नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केल्यामुळे भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे.
जळगाव महानगरपालिकेत महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी भारतीय पक्षातर्फे व्हीप बजावण्यात आला होता. मात्र 27 बंडखोरांनी व्हीपचे उल्लंघन करुन, महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केले.
त्यामुळे अडीच वर्षातच भाजपला महापालिकेतून पायउतार व्हावे लागले. दरम्यान, त्या बंडखोर नगसेवकांच्या अपात्रतेसाठी नाशिक विभागीय महसूल आयुक्त, राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली.
यावेळी महानगरपालिकेचे गटनेते भगत बालाणी, नाशिक महापालिकेचे गटतेने जगदिश पाटील, अॅड. सतीष भगत, शरद मेढे, सोमनाथ उगलमुगले उपस्थित होते.