धंगेकरांना यश मिळेल याची मला स्वतःला खात्री नव्हती, शरद पवार असं का म्हणाले?

धंगेकरांना यश मिळेल याची मला स्वतःला खात्री नव्हती, शरद पवार असं का म्हणाले?

पुणे | Pune

गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात कसबा पोटनिवडणुकीची चर्चा चालू आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी ११ हजाराहून जास्त मतांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असणारा हा मतदारसंघ काँग्रेसनं जिंकला आहे.

दरम्यान कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी शरद पवार यांनी रवींद्र धंगेकर यांचं अभिनंदन केलं. कसब्यातील विजय, राज्यातील बदलाचं वातावरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर त्यांनी भाष्य केलं. यावेळी पवार म्हणाले की, कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या रुपानं यश मिळेल असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं पण मला स्वतःला त्याची खात्री नव्हती असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

तो अनेक वर्ष भाजपचा गड आहे असं म्हटलं जात होतं. दुसरी गोष्ट अशी की तिथं अनेक वर्ष गिरीष बापटांनी लक्ष केंद्रीत केलेलं आहे. बापट हे स्वतः सतत लोकांचे प्रश्न सोडवले. बापटांचं वैशिष्ट्य हे होतं की भाजपशिवाय इतरांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळं साहजिकच त्यांचं लक्ष ज्या ठिकाणी आधीच केंद्रीत आहे तो मतदारसंघ आपल्याला जड जाईल असं वाटत होतं. बापट आणि टिळकांना डावलून निर्णय घेतल्याचा फटका भाजपला बसणार अशी चर्चा होती. भाजपच्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला, असं शरद पवार म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा सवाल पवार यांना करण्यात आला. त्यावर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक एकत्र लढण्याची चर्चा माझ्याशी झाली नाही. त्या चर्चेत मी नाही. माझे सहकारी आहेत. ते निर्णय घेतील. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याची जबाबदारी घेतली जाईल. एकत्र लढण्यावर भर देऊ. लोकांना बदल व्हावा असं लोकांना वाटतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडी विधानसभेला २०० आणि लोकसभेला ४० जागा निवडून येईल असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत पवारांना विचारण्यात आलं. त्यावर, संजय राऊत पत्रकार आहेत. त्यांचा अभ्यास असतो. त्यामुळे त्यांनी काही आकडा सांगितला असेल. मला आकडा सांगता येणार नाही. पण लोकांना मी भेटतोय. तर लोकांना बदल हवा आहे. लोक मला सांगत आहे. आम्हाला बदल करायचा आहे, असं लोकं बोलत आहेत, असंही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com