दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :
जिल्ह्यात पहिल्या पावसात शेतकर्यांनी इतर पिकाची पेरणी व कापसाची लागवड केली होती. परंतु नंतर जवळपास एक महिना पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकर्यांना दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणीसाठी आर्थिक मदतीसह जिल्हा दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी आ. जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
याबाबत आ. रावल म्हणाले की, पावसाळा सुरू होवून जवळपास दीड महिना झालेला आहे. सुरवातीचा एक पाऊस सोडला तर त्यानंतर पाऊस झालेलाच नाही.
त्यामुळे सर्व पिके करपली आहेत अगोदरच कोरोनाचे संकट आणि त्यावर हे अस्मानी संकट शेतकर्यांवर आल्याने शेतकरी अडचणीत आला असून मदतीची नितांत गरज आहे त्यामुळे तातडीने निर्णय घेऊन शेतकर्यांना दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत आणि जिल्हा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आ. जयकुमार रावल यांनी केली आहे.