<p><strong>मुंबई | प्रतिनिधी </strong></p><p>ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची उडालेली झुंबड तसेच जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने मंदावलेल्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये...</p> .<p>यासाठी आज राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.</p><p>ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असल्याने ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत याबाबत राज्यभरातून विनंती करण्यात येत असल्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले.</p><p>मुंडे यांच्या निर्देशानुसार बार्टीमार्फत याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोहोच पावती मिळावी यासाठी ३० डिसेंबर रोजीही अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी - कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे.</p><p>तसेच या दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत. त्याचबरोबर ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती ०१ जानेवारी पर्यंत ‘बार्टी’कडे लेखी स्वरूपात कळवावी असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.</p>