
मुंबई | Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत असताना ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा लवकरच उडणार आहे. तसे महत्त्वाचे अपडेट्स राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या, तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.
मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
तर, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. अनेक जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. तर काही ठिकाणी पोटनिवडणूक प्रस्तावित आहे. त्यामुळे राज्यात दिवाळीआधीच राजकीय फटाके फुटणार आहेत.
इतर मागासवर्ग समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण, प्रभाग रचना यामुळे महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. या निवडणुका कधी जाहीर होतील, याकडे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे डोळे लागले असताना राज्य निवडणूक आयोगाने आज ३४ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीत ग्रामपंचायतींच्या ३ हजार ८० रिक्तपदासांठी देखील मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.