जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
जिल्हयात गेल्या मार्च ते मे अखेरपर्यंत कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाउनसह संचारबंदीमुळे ग्रामपंचायत निवडणूका स्थगीत करण्यात येवून पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
तब्बल सहा ते साडेसहा महिने पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात आज बुधवार दि.23 ते दि.30 डिसेबर दरम्यान उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
पहिल्याप्रमाणे आरक्षणाव्दारे थेट लोकनियुक्त सरपंच निवडी ऐवजी निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण पुढच्या 30 दिवसांत काढले जाणार आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणूका ह्या पूर्णपणे वेगळया असल्याने सर्वच ठिकाणी उमेदवारांसह मुरब्बी राजकारण्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. तसेच यावेळी प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड होणार असल्याने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
उमेदवारांना गळाला लावण्यासाठी गुप्त बैठका
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते लागणार्या कागदपत्रांची जुळवाजुळवीसह कार्यकर्ते, पाठीराख्यांची जमवाजमव अगोदरच सुरू करण्यात आली आहे. गावपातळीवर निवडणुकीच्या मैदानात उमेदवार म्हणून उतरविण्याची तयारी झाली आहे. कोणता उमेदवार कोणासाठी उमेदवारी करू शकतो, याचे आडाखे बांधले जात असून पट्टीचे राजकारण करणारे गावातील जाणते उमेदवारांना गळाला लावण्यासाठी गुप्त बैठका सुरू आहेत. त्यामुळे गावातील वातावरण आतापासून ढवळून निघाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना आले महत्व
ग्रामपंचायत निवडणूका आटोपल्या कि त्या पाठोपाठ आगामी काळात होणार्या बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, स्टाइस, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले झाल्याने सर्वच राजकिय पक्षांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
सत्ताधारी व विरोधकांचे गट सक्रीय
ऐन थंडीत जिल्हयातील पंधरा तालुका परिसरातील 783 ग्रामपंचायतींचा ग्रामीण भागातील गावगाडा तापणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी गेल्या आठवडाभरापासूनच कागदपत्रांची तयारी जोमात सुरु केली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने गावोगावचे स्थानिक पातळीवरील पुढारी आता तयारीला लागले आहेत. गावातील प्रमुख नेतेमंडळीच्या पडद्याआडून हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील सत्ताधारी व विरोधकांचे गट गावात सक्रिय झाले असून, त्यांनी गावातील संपर्क वाढविला आहे. काहींनी तर खर्च करण्यासही सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले असून हॉटेल, ढाबे रेस्टाँरंट यांच्यावर होणारी गर्दीमुळे कोरोना लॉकडाउन काळातील नुकसानीची बसलेली झळ भरून निघण्याच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत.
तर प्रशासनाकडून निवडणूकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले असून निवडणूक प्रकियेसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावरून प्रशासन सज्ज असल्याचे म्हटले आहे.