
मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या (Governor Appointed MLC) नियुक्तीवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने या नियुक्त्या तातडीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महायुतीचा (Mahayuti) आमदारांच्या नियुक्तीबाबतचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर (Maharashtra Assembly Monsoon Session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या स्वाक्षरीने १२ सदस्यांची यादी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांना दिली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या (BJP) वाट्याला ६, मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला (ShivSena) ३ आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाला ३ जागा मिळणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा (NCP) गट सरकारमध्ये सहभागी होण्याआधी भाजप आणि शिंदे गट यांच्यात ८ आणि ४ असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र, अजित पवार गटाच्या सहभागानंतर तिन्ही पक्षांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या समान म्हणजे प्रत्येकी ४ जागा घ्याव्यात, अशी चर्चा झाल्याचे बोलेले जात आहे. त्यामुळे महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच या नियुक्त्यांनंतर विधान परिषदेतील (Legislative Council) संख्याबळाचे पक्षीय समीकरण देखील बदलणार आहे.