
पुणे | Pune
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झाली. या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या जागेवर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे...
मविआकडून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. याचाच एक भाग म्हणून तब्येत व्यवस्थित नसूनही गिरीश बापट हे गुरुवारी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. केसरीवाडा येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला गिरीश बापट यांनी उपस्थिती लावली होती.
मात्र, यानंतर गिरीश बापट यांनी प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांनी पत्रक काढून आपण कसब्याच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांच्या आग्रहाखातर गिरीश बापट यांनी केसरीवाडा येथील मेळाव्याला उपस्थिती लावली होती. परंतु, यामुळे गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याने चिंता वाढली आहे.
गिरीश बापट यांना सध्या आठवड्यातून दोनवेळा डायलिसिस करावे लागते. त्यामुळे बापट सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात. परंतु, काल त्यांनी पक्षासाठी कसब्याच्या प्रचारात सहभाग घेतला. मात्र, आज लगेच त्याचा परिणाम झाला असून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे गिरीश बापट यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
'बापट यांना पाहून पर्रीकरांची आठवण झाली. बापट साहेबांना त्रास होत आहे, तरी देखील ते प्रचारात उतरले आहे. त्रास बापट साहेबांना होतो मात्र त्यांच्या यातना आम्हाला जाणवतात. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे, याचा मानसिक त्रास आम्हाला होत असल्यामुळे मी आज व्यक्तिश: प्रचार करणार नाही.
गिरीश बापट हे १९६८ पासून प्रचारामध्ये सहभागी होत आलेले आहेत. त्यामुळे घोडा किती ही म्हातारा झाला तरी पळतो. सिंह किती ही म्हातारा झाला तरी मास खातो. त्यामुळे गिरीश बापट यांच्या डोक्यात राजकारणाची एक खुजली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्यासाठी एक विशेष ट्विट केले आहे. तसेच गिरीश बापट यांचा मार्गदर्शन करतानाचा एक व्हिडीओ देखील त्यांनी पोस्ट केला आहे.
फडणवीसांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, “असे खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद, हीच भाजपची ओळख. देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः ! गिरीशभाऊ…कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात. इथल्या मनामनांत तुम्ही भाजपाचे कमळ रुजवले. मतदारराजा तुमचा शब्द राखल्याशिवाय राहणार नाही !”, असे फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे.