
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यात समान नागरी कायद्यासाठी, कांदिवली येथील भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी तत्काळ समिती गठीत करण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी कायदा करण्याचे अधिकार राज्यांना आहेत, असा निर्णय उत्तराखंड सरकारने नेमलेल्या समितीच्या विरोधात दाखल याचिकेवर दिला आहे. त्या संदर्भानुसार महाराष्ट्र राज्यातही समान नागरी कायदा आणण्यासाठी समिती नेमण्यात यावी, असे भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक रद्द करुन मुस्लिम भगीनींना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. त्यानुसार राज्यात समान नागरी कायदा आणल्यास खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता होईल असेही भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या मागणीवर सकारात्मक विचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.