जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
भाजपचे माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे असते तर आज राजकारणाची दिशा वेगळी राहिली असती, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी भावुक होऊन केले.
श्री.खडसे यांनी आपल्या मुक्ताई निवासस्थानी आज स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी केली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर पत्रकरांशी वार्तालाप करताना एकनाथराव खडसे म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्यांना जाऊन आज 6 वर्षे झाली.
या काळात एकही दिवस असा नाही की त्यांची आठवण झाली नाही. ते आयुष्यभर गरीब आणि दुर्बलांसाठी काम करत राहिले. त्यांचे कार्यकर्त्यांवर प्रेम होते म्हणून कार्यकर्ते जुळत राहिले.
ते अचानक गेल्याने मोठी हानी झाली. ते होते तोपर्यंत राज्याच्या राजकारणाची दिशा वेगळी होती. आज गोपीनाथराव मुंडे असते तर राजकारणाची दिशा वेगळी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.