
मुंबई | Mumbai
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील राजकीय परिस्थिचीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार, आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठक चर्चा झाल्याचे अंदाज बांधले जात होते. मात्र बैठकीत नेमकं काय झालं याची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीची बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती ट्वीट करत दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे की, काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.
राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार…. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे.