मुंबई | Mumbai
राज्यातील राजकीय वातावरण तापल्यानंतर वेगवान राजकीय हालचालींना वेग येत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जावून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांचे आता सुरतवरुन एअरलिफ्ट करून त्यांना गुवाहाटीला नेण्याची शक्यता आहे. सुरतच्या हॉटेलमधून हे आमदार आता गुजरात पासिंगच्या गाड्यांमधून विमानतळाकडे जात आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 35 आमदार असून त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारला आहे. हे आमदार पहाटे सुरतमध्ये आले होते. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली.
शिवसेनेने महाविकास आघाडीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडावं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आता या सर्व आमदारांना गुवाहाटीला नेण्यात येत असून रात्री एक वाजेपर्यंत ते गुवाहाटीला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रात्री महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.