नाशिक | Nashik
भाजपा (BJP) नेते आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व आले आहे.
मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीमागचे कारण कळू शकले नाही. मात्र, या भेटींमुळे भाजपा-मनसे युतीची (BJP-MNS Alliance) चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
अशातच भविष्यात राजकारणात काहीही होऊ शकतं असं विधान माजी मंत्री व राष्ट्रवादीचे (NCP) नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले आहे. महानुभाव पंथाच्या संमेलनानिमित्त आमदार खडसे नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सूचक विधान केलं आहे.
खडसे म्हणाले की, ‘सध्या राज्याच्या राजकारणात काहीही व अनाकलनीय घडते आहे. तीन पक्षांचे सरकार सत्तेवर येईल, असे कोणाला वाटले नव्हते; मात्र ते झाले, हे खरे आहे. फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी देखील राज्यातील नागरिकांनी पाहिला. एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन बाहेर पडतील, याची कल्पना देखील कोणी केली नव्हती. राजकारणात भविष्यात काहीही होऊ शकतं. त्यामुळे भाजपा-मनसे एकत्र आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ‘