
नाशिक | मोहन कानकाटे | Nashik
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून (Chief Minister Post) रस्सीखेच सुरु आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार अशी चर्चा ऐकायला मिळते तर कधी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) समर्थक अजितदादांचा भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावतांना दिसतात. भाजप देखील यात मागे नसून दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत 'एक्स' (ट्विटर) या सोशल मीडिया अकाऊंटवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन,' अशा आशयाची चित्रफित प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खरंच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? याबाबतच्या चर्चांना ऊत आला आहे.
फडणवीसांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly Elections) विधानसभेच्या सभागृहात विरोधकांना उद्देशून 'मी पुन्हा येईन' ही कविता म्हटली होती. त्यानंतर विधानसभेच्या प्रचारात देखील देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा या वाक्याचा पुनरुच्चार केला होता. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका देखील झाली होती. तसेच अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले होते. मात्र, त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदावर येता आले नाही. यानंतर अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी करून तीन दिवस मुख्यमंत्री राहिल्यानंतर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अडीच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) झाले. मात्र, ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा 'मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बसाना, मैं समंदर हूँ लौटकर वापस आऊँगा' असा विरोधकांना सल्ला देणारा एक जुनी चित्रफित व्हायरल झाली होता.
यानंतर आता पुन्हा एकदा भाजपच्या (BJP) अधिकृत 'एक्स' (ट्विटर) या सोशल मीडिया अकाऊंटवर देवेंद्र फडणवीस यांची जुनी चित्रफित पोस्ट करण्यात आल्याने फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रतिक्रिया उमटल्यानंतर काही वेळातच सावध भूमिका घेत भाजपने चित्रफित डिलिट केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती आहे का? एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होणार म्हणून फडणवीस पुन्हा येणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. फडणवीसांकडून हा विषय संपविण्यात आला असला तरी गेल्या दोन वर्षातील राजकीय घडामोडी बघता महाराष्ट्रातील राजकारणात कधी भूकंप होईल याचा नेम नाही.