शिवसेनेबरोबर यूती करून चूक – फडणवीस

मुंबई –

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर यूती करून चूक झाली नाहीतर विधानसभा निवडणुकीत

150 जागांपेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते होते. भाऊ तोरसेकरांनी जी राजकीयं भाकितं केली होती त्याचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले, युती केली हेच चुकलं! नाहीतर विधानसभा निवडणुकीत 150 जागांच्या पुढे गेलो असतो. विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती केली हीच चूक झाली नाहीतर भाजपाला 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या.

भाऊ तोरसेकर यांनी 2013 मध्ये सांगितलं होतं की भाजपाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडलं तर संपूर्ण बहुमत 272+ जागा भाजपाला मिळतील. त्यावेळी भाऊ तोरसेकर अशक्य वाटणारा अंदाज बांधत आहेत असं अनेकांना वाटलं. मात्र त्यांचं ते भाकित खरं ठरलं. 2019 मध्येही काहिशी अस्थिरता होती. त्यावेळीही भाऊ म्हणाले होते की 300+ जागा येतील. लोकसभा निवडणुकीत तेच घडलं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी एक पुस्तक लिहून भाजपाला पर्याय दिले होते. भाजपा 150+ किंवा युती 200+ त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय निवडला नसता तर तोरसेकर यांचं तिसरं भाकित खरं ठरलं असतं. आपण मोदींच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात 150+ जागा जिंकल्या असत्या. युती केली हीच चूक झाली असं फडणवीस म्हणाले आहेत.

करोनाच्या काळात सुद्धा विक्रमी एफडीआय भारतात आला. हा आज जगाचा भारतावर असलेला विश्वास आहे. शेतकरी वर्गासाठी सर्वाधिक कल्याणाच्या योजना पंतप्रधान मोदी यांनी राबविल्या. आता सुद्धा अनेक योजना राबविल्या जात असताना केवळ गैरसमज निर्माण केले जात आहेत.दिल्लीतील प्रस्थापितांना मोठे आव्हान देण्याचे काम त्यांनी केले. ती व्यवस्था एकतर आमच्यातील व्हा किंवा बाहेर जा, ही सांगणारी होती. पण पंतप्रधान मोदी हे त्या व्यवस्थेचे भाग न बनता त्यांनी एक नवी व्यवस्था निर्माण केली असेही फडणवीस म्हणाले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *