
मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासमोर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावर भाष्य केले आहे....
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व ठिकाणी लोकप्रिय आहेत. लोकप्रियतेची काही स्पर्धा झाली, तर मोदींच्या लोकप्रियतेत मुंबई पहिल्या क्रमांकावर असेल. इतके मुंबईकरांचे मोदींवर प्रेम आहे.
२०१९ मध्ये मोदींनी मुंबईतच म्हटले होते की, पाच वर्षांच्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्र बदलला. पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आणण्याचे आवाहन केले होते. मात्र काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले नाही.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले, असे ते म्हणाले.
आज मेट्रोच्या ७ व २ लाईनच्या ३५ किलोमीटरचे उद्घाटन होत आहे. त्याचे भूमिपूजन मोदींनीच केले होते आणि आता उद्घाटनही तेच करत आहेत. ही नवी संस्कृती मोदींमुळे राज्यात आणि देशात निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, आज अनेक उद्घाटन होणार आहे, त्यात पंतप्रधान स्वनिधी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. करोना काळात पंतप्रधान मोदींनी टपरीवाल्यापासून हातगाडीवाल्यापर्यंत सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वनिधीची निर्मिती केली.
मात्र, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्यात गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आमचे सरकार आल्यावर आम्ही मुंबईतील एक लाख हातगाडी-टपरीधारकांना स्वनिधीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. आज हा आकडा एक लाख १५ हजारपर्यंत पोहचला आहे, असेही फडणवीस म्हणाले.