Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'विरोधकांनी आपला हेतू व मेंदू तपासण्याची गरज'

‘विरोधकांनी आपला हेतू व मेंदू तपासण्याची गरज’

मुंबई l Mumbai

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रंगलेला कलगीतुरा अद्याप थांबताना दिसत नाही.

- Advertisement -

अजितदादांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे त्यांनी एकतर राज्य पुण्यातून चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

“अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत.” अशा शब्दात अजित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

पवार पुढे म्हणाले की, ”भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती. टेलिव्हिजनच्या पडद्यावर चमकण्यासाठी हपापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करू नये. करोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करू नये.” असे पवार यांनी म्हंटलं आहे.

“दररोज सकाळी सात वाजल्यापासून मी सर्वांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी उपलब्ध असतो. भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेट घेतात. दिवसभर फोन करतात. गेली दीड वर्षे हा कार्यक्रम अखंड सुरू आहे. लोकांच्या सतत संपर्कात राहणारा मी कार्यकर्ता आहे. मंत्रालयात आणि राज्यातील जनतेत मी कायम उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’चा हा आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासून घेण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र सध्या करोनाच्या भीषण संकटाशी लढत आहे. रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करणे, हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा, रेमेडेसिव्हिर इंजेक्शनची उपलब्धता सुनिश्चित करणे, ही माझी प्राथमिकता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांशी, सहकारी मंत्र्यांशी, लोकप्रतिनिधींशी, विभागीय आयुक्तांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद सुरू आहे. उद्योगक्षेत्राशी चर्चा केली जात आहे. त्यातून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवणे आणि रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करणे ही आजची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नेते खोटे-नाटे आरोप करून महाराष्ट्राची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करत आहेत.

त्यांची वक्तव्ये ही राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करून राज्याला अडचणीत आणणारी आहेत. भाजपच्या नेत्यांनी त्यांचा वेळ आणि ताकद केंद्राकडून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी वापरावी, ते महाराष्ट्रातील जनतेसाठी हितावह ठरेल. कोरोनाविरुद्धची लढाई महाराष्ट्र जिंकणार आहे. अशातच महाराष्ट्राची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करण्याचं पाप विरोधी पक्षांनी करू नये, असेही अजित पवार म्हणाले

- Advertisment -

ताज्या बातम्या