'पेगॅसस'च्या माध्यमातून देशाला बदनाम करण्याचा कट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
'पेगॅसस'च्या माध्यमातून देशाला बदनाम करण्याचा कट

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

जेव्हा जेव्हा भारत देश ( India ) पुढे जातोय असे दिसते, तेव्हा काही लोक आपले हितसंबंध जपण्यासाठी भारताला बदनाम करण्याचा कट करतात. मध्यंतरी काही मीडियांना चीनकडून निधी मिळत असल्याचे समोर आले होते. चिनी पैसा घेऊन ते भारतविरोधी अपप्रचार करत होते. याचा अर्थ स्पष्ट असून अशा प्रकारच्या कपोलकल्पित बातम्यांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. संसदेचे कामकाज बंद पाडण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis ) यांनी मंगळवारी केला.

इस्रायलच्या 'पेगॅसस स्पायवेअर'च्या (Israel's 'Pegasus Spyware' ) माध्यमातून भारतातील काही महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवली जात असल्याच्या आरोपांवरून सध्या देशभर गदारोळ सुरू आहे. फडणवीस सरकारच्या काळातही अशा प्रकारे हेरगिरी झाल्याचा आरोप राज्यातील नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यावर भूमिका मांडताना हेरगिरीचा आरोप फेटाळून लावला.

'पेगॅसस विषयीच्या बातम्यांना कुठलाही आधार नाही. हे सॉफ्टवेअर बनविणाऱ्या कंपनीनेही याबाबतचे वृत्त फेटाळले आहे. त्यांनी संबंधित माध्यम संस्थेला नोटीसही दिली आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशी बातमी देऊन भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट असल्याचे फडणवीस म्हणाले.

मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातही अनेकदा फोन टॅपिंगचे आरोप झाले होते. १७ ऑक्टोबर २००९ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या त्यावेळच्या कम्युनिस्ट सरकारवर फोन, इमेल आणि एसएमएस टॅपिंग केल्याचा आरोप केला होता. २६ एप्रिल २०१० रोजी फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर संसदेत मोठा गोंधळ झाला. त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मनमोहन सिंग याबाबत भूमिका स्पष्ट करतील असे सांगितले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी स्वत: लोकसभेत सरकारची भूमिका मांडली होती, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

राष्ट्रीय सुरक्षा, करचोरी आणि मनी लाँडरिंग अशा बाबींसाठी टॅपिंग होत असते, पण त्याची माहिती बाहेर जाऊ नये याची काळजी घेतली जाते. यात काहीही बेकायदेशीर झालेले नाही. त्यामुळे संयुक्त संसदीय समिती नेमून चौकशीची गरज नाही, असे मनमोहन सिंग यांनी तेव्हा सांगितले होते. आमच्या सरकारनेही हे स्पष्ट केलेले आहे की केंद्र सरकारची कुठलीही एजन्सी बेकायदा फोन टॅपिंग करत नाही. आपल्याकदे टेलिग्राफ कायदा आहे. त्याअंतर्गत योग्य ती खबरदारी घेऊन माहिती मिळवता येते. त्यामुळे 'पेगॅसिस'वरून आता होणारे आरोप हे एक षडयंत्र आहे, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस सरकारच्या काळातही 'पेगॅसस'चा वापर झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. हा आरोप फेटाळून लावताना ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असेपर्यंत 'एनएसओ'ची (पेगॅसस बनवणारी कंपनी) कुठलीही सेवा राज्य सरकारने घेतलेली नाही. माझ्या कार्यकाळात माहिती खात्याचे एक शिष्टमंडळ इस्रायलला गेले होते. त्यांचा दौरा निवडणुकीच्या आधी ठरला असला तरी प्रत्यक्षात हे शिष्टमंडळ निवडणुकीच्या नंतर इस्रायलला गेले होते. शेती आणि शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी हा दौरा होता. त्यामुळे माझ्या काळात तरी असे काही झालेले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com