मुंबई | प्रतिनिधी Mumbai
नागपूर( Nagpur ) येथील वकील सतीश उके ( Adv Satish Uke ) यांना ईडीने अटक केल्यानंतर नाना पटोले यांच्या वकीलाला अटक केल्याचा अपप्रचार केला जात आहे. राज्यात काँग्रेस पक्षाला समर्थन वाढत असल्याने जाणीवपूर्वक माझी आणि काँग्रेस पक्षाची बदनामी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole )यांनी शुक्रवारी केला.
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून ईडीने ( ED ) उके यांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून दबावतंत्र वापरले जात आहे. राजकीय विरोधकांना लक्ष्य करत असतानाच आता त्यांच्याशी संबंधित लोकांवरही कारवाई केली जात आहे.
नागपूरचे विधिज्ञ सतीश उके यांनी भाजपच्या काही नेत्यांच्या तक्रारी केल्या असून त्यातील काही प्रकरणात भाजपचे नेते कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात. म्हणूनच ईडीच्या मार्फत त्यांच्यावर षडयंत्र रचून कारवाई केली. त्यासाठी मुंबईचे ईडी पथक नागपुरात आणून तसेच केंद्रीय पोलीस दल आणून ही कारवाई केली, असा आरोप पटोले यांनी केला.
या कारवाईवेळी नागपूर ईडी आणि पोलिसांनाही अंधारात ठेवण्यात आले. सतीश उके यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडली आहे. ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर मात्र उके हे फक्त नाना पटोले यांचेच वकील आहेत असे चित्र निर्माण करुन माझी बदनामी केली जात आहे. पण त्यात ते यशस्वी होणार नाहीत, असे पटोले म्हणाले.
शेअर मार्केट घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताचे वकीलपत्र भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी घेतले होते. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले राम जेठमलानी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचे वकीलपत्र घेतले होते. संसद हल्ल्यातील दोषी दहशतवादी अफजल गुरुचेही वकीलपत्र जेठमलानी यांच्याकडे होते. माझा आणि सतिश उके यांचा संबंध लावला जात असेल तर मग त्याच न्यायाने राम जेठमलानी, अरुण जेटली यांचाही संबंध लावायचा का? असा प्रश्न पटोले यांनी केला.