Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या...तर सळो की पळो करून सोडू; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपला...

…तर सळो की पळो करून सोडू; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपला इशारा

मुंबई | प्रतिनिधी

हिंदू -मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजप देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र संविधान, लोकशाही आणि देशातील एकता तसेच अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत.

- Advertisement -

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी भाजपच्या हुकूमशाही व्यवस्थेच्या विरोधात जनतेत जागृती आणि विश्वास निर्माण केला. त्यामुळे राहुल गांधींची वाढती लोकप्रियता पाहून घाबरून भाजपची रावणप्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यावर उतरली आहे. पण राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लावला तर आम्ही तुम्हाला ‘सळो की पळो करुन सोडू’, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भाजपला दिला.

“शरद पवार आपल्या मर्जीनुसार…”; निवडणूक आयोगात अजित पवार गटाचा गंभीर आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपने रावणाच्या अवतारात दाखवले आहे. भाजपने यासंदर्भातील छायाचित्र समाज माध्यमात टाकले. यावर काँग्रेसने आज तीव्र प्रतिक्रिया दिली. पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज चेंबूर रेल्वे स्थानकाजवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या तत्वानुसार काँग्रेस पक्षाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. पण भाजपने अति केले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही पटोले यांनी दिला.

१९४५ मध्ये ‘अग्रणी’ या मराठी वृत्तपत्रात महात्मा गांधींना रावणाच्या प्रतिमेत दाखवून भाजप आणि संघाच्या लोकांनी त्यांची बदनामी केली होती. आता त्याच प्रवृत्तींनी इतिहासाची पुनरावृत्ती करत राहुल गांधी यांना रावणाच्या प्रतिमेत दाखवून त्यांची बदनामी केली आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा देशाच्या रक्षणासाठी गांधीच पुढे येतात.

ज्या लोकांनी मृतदेह ठेवायच्या पिशव्यांच्या व्यवहारात…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर खरमरीत टिका

या देशाला गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले आणि राष्ट्र म्हणून उभे केले. रावणप्रवृत्तीच्या भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यात काडीचाही संबंध नाही. आज राहुल गांधी यांची जनतेत लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ते जनतेचे नायक आहेत म्हणनूच भाजपची खलनायकी प्रवृत्ती त्यांच्याविरोधात सातत्याने कारस्थाने करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

मुंबई काँग्रेसचे आंदोलन

दरम्यान, राहुल गांधी यांना रावण अवतारात दाखविल्याचा निषेध म्हणून मुंबई काँग्रेसच्या वतीने आज आझाद मैदान येथे निषेध आंदोलन करण्यात आले. आमच्या नेत्यांबद्दल भाजपच्या आयटी सेलकडून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित होतो. पण त्यांच्याविरोधात काहीच कारवाई होत नाही. हेच जर आमच्याकडून झाले तर आमच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल होतात. महात्मा गांधी यांची बदनामी करणारे खुलेआम फिरत आहेत.

काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू यांचे चेहरे रावणाच्या तोंडांवर लावून गोळी मारणारे पोस्टरही याच प्रवृत्तीच्या लोकांनी फडकावले होते, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार संजय निरूपम, माजी आमदार मधू चव्हाण, अशोक जाधव आदी सहभागी झाले होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या