आंतरराष्ट्रीय मदतीत महाराष्ट्राला डावलले

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
आंतरराष्ट्रीय मदतीत महाराष्ट्राला डावलले

मुंबई / प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकार कोरोनाच्या संकटात मदत करताना महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ४० देशांनी केलेल्या मदत वाटपात मोदी सरकारने महाराष्ट्राला डावलले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी केला.

प्रथम केंद्र सरकार या मदत सामुग्रीवर बसून राहिले. वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र वगळून भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, बिहार आणि अन्य राज्यांना मदत देण्यात आली. केंद्र सरकारच्या या कृतीचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून राज्यातील भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला या भेदभावाचे उत्तर द्यावे, अशी मागणीही सावंत यांनी केली.

जवळपास २५ विमानातून अनेक देशांकडून देशाला मदत आली आहे. या देशांमधील अनेक भारतीय वंशाच्या लोकांना भारतातील आपापल्या राज्यांना मदत करावयाची असेल.
या आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे पीएम केअर फंडाप्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे तसेच ते संघराज्य पध्दतीला छेद देणारेही आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

मोदी सरकार महाराष्ट्र सरकारला सातत्याने सापत्नभावाची वागणूक देत आहे. सुरुवातीला कोरोनासंदर्भातील वैद्यकीय साहित्य पुरवण्यात भेदभाव केला. त्यानंतर रेमडेसीवीर, ऑक्सिजन तसेच लस पुरवठा करण्यातही दुजाभाव केला जात आहे. केवळ विरोधी पक्षाचे सरकार असल्याने केंद्राकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप सावंत यांनी लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com