
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) पाच जागांसाठी नुकतीच निवडणूक (Election) पार पडली. यात सर्वाधिक लक्ष वेधलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विजयानंतर आता कार्यकर्त्यांमधील खदखद उफाळून आली आहे. कॉंग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. त्यातच कॉंग्रेस प्रवक्त्या आणि नाशिकच्या माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील (Dr. Hemlata Patil) यांनी या प्रकारावर सूचक ट्विट केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे...
ऐन निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तांबे यांच्या धक्कादायक खेळीमुळे कॉंग्रेसनं पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली.
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर आता कार्यकर्त्यांमधील खदखद बाहेर येऊ लागली आहे. कॉंग्रेसमधील (Congress) राजकारणामुळे तांबे कुटुंबियांवर अपक्ष उभे राहण्याची वेळ आली,असा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे.
कॉंग्रेस प्रवक्त्या आणि नाशिकच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी या प्रकारावर सूचक ट्विट करत म्हटलं आहे की, ' आज सकाळी सकाळी फोन आला, ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे की, नानांच्या कॉंग्रेसचे? आता काय उत्तर देऊ कप्पाळ? ' असं सांगत नाशिकमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची खदखद उघड केली आहे.याची शहरभर चर्चा होत आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना पक्षभेद विसरत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छुपी मदत केल्याचं बोललं जात आहे. संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये थोरातांचे वर्चस्व आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीत घडलेल्या राजकारणामुळे याठिकाणी पक्षाला गटबाजीचा फटका बसला आहे.
राज्यात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झालं. या निवडणुकीत सत्यजित चांगल्या मताने विजयी झाला. त्याचं आम्ही अभिनंदन करतो. मात्र या निवडणुकीत जे राजकारण झालं, ते मला व्यथित करणारं आहे. त्याबाबतच्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. नाना पटोलेंसोबत काम करणं अशक्य झालंय, असंच सुरू राहिल्यास कॉंग्रेसमध्ये दोन गट पडतील, असा सूचक इशाराही बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रामधून दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.