पणजी | Panji
देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ अभियानाची सुरूवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथून या यात्रेची सुरूवात झाली. त्यातच आता काँग्रेसला एक धक्का बसला आहे.
काँग्रेसकडून निवडून आलेल्या ११ पैकी ८ आमदारांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून कळवले आहे.
भाजपत सामील झालेल्या आमदारांमध्ये दिगंबर कामत, मायकेल लोबो, डेलिला लोबो, राजेश फलदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश आहे.
दरम्यान यावर्षी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी मंदिर, चर्च व मशिदीत जाऊन निवडून आल्यानंतर पक्ष सोडणार नसल्याची शपथ घेतली होती. पुढे काँग्रेसने आमदार भाजपात जाऊ नये म्हणून काही काळ निवडून आलेल्या आमदारांना अज्ञातवासामध्ये देखील नेऊन ठेवले होते. असे असताना आता काँग्रेस आमदारांनी शपथ मोडून भाजपात प्रवेश केला आहे.