
सातारा | Satara
एल्विश प्रकरणावरुन (Elvish Yadav Drug Case) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद-विवाद सुरु झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरुन संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
एल्विश प्रकरणी संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. देशातील सर्वात मोठा ड्रग्ज माफीया, जो सापांचे विष देखील विकत आहे. तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरी येतो. त्याचे आदरातीथ्य केले जाते. पुणे, नाशिक आणि राज्यात ड्रग्जची तस्करी सुरु आहे. त्याचे सूत्र सरकारमध्ये आहेत का? तुमच्याकडे कोण येतंय कोण नाही हे पाहायची यंत्रणा नाही का, असा सवाल त्यांनी केला होता.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देत म्हंटले, “विरोधकांना कामं काय आहेत? आम्ही कामं करतो, विरोधकांना काही काम उरलंय का? रोज आरोप करणं हेच विरोधकांना काम आहे. आम्ही कामातून उत्तर देतोय. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प सुरू करतोय. तुम्ही इगो ठेवून अनेक कामे बंद केली होती, असे राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. रोज सकाळी उठले की त्यांना तेच काम आहे. रोज सकाळी उठलो की आम्ही कामे करतो”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज साताऱ्यातील दरे तांब येथे त्यांच्या गावी गेले आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या त्यांचा कोणताही कार्यक्रम, बैठका, भेटी आदी कार्यक्रम अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून त्यादृष्टीने ते अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. याचबरोबर बांबू लागवड प्रकल्पासह स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाचा ते आढावा घेणार आहेत.
टिकणारे आरक्षण देऊ
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर ही भाष्य केले असून ते म्हणाले, जरांगे पाटील यांना मी काल धन्यवाद दिले आहेत. मराठा समाजालाही धन्यवाद दिले आहेत. सरकारच्या विनंतीवर जरांगे यांनी विश्वास ठेवला आहे. आम्ही मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार आहोत. इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळात झालेल्या तारखेच्या घोळावर भाष्य करणे टाळले.