
मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली गावामध्ये सुरू असलेले उपोषण आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी १७ व्या दिवशी सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देत मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राज्य सरकारला एक महिन्यांची मुदत देत आणि आपले उपोषण मागे घेतले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणाला बसवल्याचा गंभीर आरोप रविवारी केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर (Eknath Shinde Ans To Nana Patole) दिले आहे.
पटोले यांना राज्यात कुणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे, आंदोलनामागे शिंदेचा हात आहे का म्हणून, जरांगे यांनी माझ्या आवाहनाला मान दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. गृहमंत्र्यांवर केलेले आरोप खोटे असून, त्यांनी पोलिस लाठीमारप्रकरणी माफी मागितली.
ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. आंदोलक ओबीसीतून आरक्षण मागत आहेत. जरांगे यांची मागणी काय आहे, जुन्या निजामकालीन दस्तांमध्ये कुणबी नोंद असेल तर व त्यात बदल असेल तर त्याचा सर्व्हे केला पाहिजे. खरंच कुणबी नोंद असेल तर मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसींना आक्षेप नाही.
सरसकट आरक्षण देण्यास ओबीसींचा विराेध आहे. त्यामुळे अशी कोणतीही भूमिका, राज्याची नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही. जे सध्या आरोप करीत आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही. एका महिन्याचा शब्द पाळणार काय, यावर मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत.
काय म्हणाले होते नाना पटोले
जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना ३१ तारखेला मध्यरात्री आंदोलक संतप्त झाले आणि १ तारखेला दुपारी ३ वाजता गृहमंत्र्यांनी सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. यादिवशी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू होती. या बैठकीवरून लक्ष वळवण्यासाठी लाठीचार्जची घटना घडवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनीच मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला बलवले होते, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.