
नवी दिल्ली | New Delhi
नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात युपीए सरकारच्या कारभारावरून लोकसभेत कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले.
युपीए सरकारच्या काळात सहकारी साखर कारखान्यांना एफआरपीसाठी कर्ज घेण्यासाठी भाग पाडले गेले, असा आरोप खा. विखे यांनी केला. त्यानंतर यूपीए सरकारच्या काळात हे स्वतः काँग्रेसमध्ये होते. सरकारच्या योजनांचे लाभार्थी होते. त्यामुळे खाल्ल्या मिठाला जागावं, असा चिमटा खा. सुळे यांनी काढला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत या सरकारी योजनांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला. स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत, शेतकरी सशक्तीकरण हे सगळं सहकारी चळवळीतून सुरू झालं. हा स्टार्टअप इंडिया त्यांना दिसू शकला नाही. कारण यूपीए एक आणि दोनमध्ये सर्व साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी कर्ज घेण्यासाठी भाग पाडलं गेलं, असा आरोप सुजय विखे पाटील यांनी केला.
यूपीएच्या १० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने बंद केले. आज राज्यातल्या १७० टक्के मंत्र्यांनी याच बंद कारखान्यांना कमी दरात खरेदी केलं आणि मालक होऊन बसले आहेत, असा आरोप विखे पाटलांनी केला.
यानंतर बोलायला उभ्या राहिलेल्या सुप्रिया सुळेंनी या आरोपांवरून डॉ. सुजय विखे पाटलांना टोला लगावला. यूपीए एक आणि यूपीए दोन विषयी सुजय विखे पाटील खूप काही बोलले. बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे. पण मी फक्त त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की यूपीए एक आणि दोन मध्ये त्यांचे वडील सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे सर्व धोरणं निश्चित झाली तेव्हा ते काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे त्यांनी जी काही टीका केलीये, ती आपल्याच वडिलांविरोधात केली आहे. मराठीत म्हणतात खाल्ल्या मिठाला जागा. गांधी घराण्यासोबत तुमचे जवळचे संबंध होते, ते कदाचित तुम्ही विसरले असाल. पण ही त्याची पार्श्वभूमी आहे, अशी आठवण त्यांनी करून दिली.
सुप्रिया सुळे जेव्हा बोलत होत्या तेव्हा मी लोकसभेत नव्हतो. वेळ येईल तेव्हा मी संसदेत उत्तर देईन, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला सांगीतले. पंतप्रधान मोदींमुळेच साखर कारखाने टिकले, असा दावा करून वाईनमध्ये अल्कोहोल नाही, असं म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी ती पिऊन एकदा सरळ चालून दाखवावं, असे आवाहन विखे यांनी दिले.