Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्यामहाविकास आघाडीवर मुख्यमंत्र्यांची टीका; कोरोना नंतर महाराष्ट्रात...

महाविकास आघाडीवर मुख्यमंत्र्यांची टीका; कोरोना नंतर महाराष्ट्रात…

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

गेल्या तीन महिन्यात आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्राचा पूर्ण पाठिंबा असेल असे सांगितले आहे. त्यामुळे कोरोना नंतर प्रथमच महाराष्ट्र सर्व साखळ्या तोडून विजेच्या वेगाने धावत आहे. लोक उत्साही आहेत आणि उत्सव देखील साजरे झाले आहेत. एकूणच राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाविकास आघाडीला लगावला.

- Advertisement -

राज्यातील सरकार बदलले आहे. आता मुंबईचे रूपही बदलणार असून पुढील दोन -अडीच वर्षात मुंबईतील रस्ते पूर्णपणे कॉँक्रीटचे करण्यात येतील. रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त असतील आणि रस्त्यांमध्ये पाणी तुंबणार नाही, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली.

गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एसटेक प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी बोलताना शिंदे यांनी मुंबईत सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती दिली. मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर आमचा भर आहे, असे शिंदे यांनी सांगितले

आम्ही अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहोत. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. केवळ तीन महिन्यांत आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आम्ही आमच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित आहोत. महाराष्ट्राला भारतातील सर्वात विकसित राज्य म्हणून बघायचे आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना केले.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम ८४ टक्के पूर्ण झाले असून नरीमन पॉईंटहून वीस मिनिटांत रायगड जिल्ह्यात पोहचू शकणार आहोत. रायगड जिल्ह्यातही ग्रोथ सेंटर बांधण्यात येणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. एमएमआरडीएचे एक लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प होऊ घातले आहेत. आज दरवर्षी २५ हजार कोटींची कामे होतील, अशी योजना तयार करण्यात आली आहे. पुढील २० वर्षांसाठी एमएमआर प्रादेशिक योजना आणि एमएमआर वाहतूक योजना तयार केली आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या गेम चेंजर प्रकल्पाचा पहिला टप्पा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. हा महामार्ग दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड कॉरिडॉर, जेएनपीटीशी जोडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याची पंचसूत्री

या प्रदर्शनात ग्लोबल ब्रँड्सचाही समावेश आहे. आजही मुंबई आणि महाराष्ट्र या ब्रँडसाठी एकप्रकारे मॅग्नेट आहेत. कारण आज महाराष्ट्रात मोठ्या पायाभूत सुविधांचे काम सुरू होत आहे. हे ब्रँड केवळ व्यवसायासाठी येत नाहीत. त्यांच्या जागतिक दर्जाच्या कामांची खरी दाद इथेच मिळते. राज्य सरकारच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रिअल इस्टेट क्षेत्र शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. त्यामुळेच या क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सुविधा दिल्या आहेत. आमची पंचसूत्री महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले

पाच हजार किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते

राज्यात पाच हजार किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते तयार करण्यात येणार आहेत. मुंबई-गोवा ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामाचा डीपीआर तयार झाला आहे. तसेच क्लस्टर विकासाला गती देण्यात येत असून मुंबई झोपडीमुक्त करणार असल्याचे शिंदे म्हणाले. प्रीमियम, मुद्रांक कर, युनिफाईड विकास नियंत्रण नियमावली या माध्यमातून विकासकांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन तसेच बांधकाम क्षेत्रातील मनीष गांधी, एसीटेक प्रदर्शनाचे संचालक सुमीत गांधी, निरंजन हिरानंदानी, हफिज कॉंट्रॅक्टर, विकास ओबेरॉय, संदीप रुणवाल, आशीष रहेजा, हॅन्सग्रॉव्ह कंपनीचे ख्रिस्तोफी गोरलॅन, पाओलो रोमानी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या