
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राजभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळावा यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेईल आणि त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी विधानसभेत (Vidhansabha) दिली...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.
त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला घेऊन पंतप्रधानांची भेट घेण्यात येईल. त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी विनंती करण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.
तत्पूर्वी सभागृहातील कामकाज सुरू होताच छगन भुजबळ यांनी औचित्याचा मुद्दा मांडत मराठी भाषेला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो.
या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. साहित्याची श्रेष्ठता, भाषेच्या वयाचे १५०० ते २ हजार वर्षांचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचे मूळ स्वरूप आणि आजचे स्वरूप यांचे नाते असणे हे अभिजात भाषेचे चारही निकष मराठी भाषेने पूर्ण केलेले आहेत.
मात्र अद्यापही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचा विषय रखडलेला आहे, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणीही त्यांनी केली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने तयार केलेला अहवाल केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांनी सर्वानुमते मंजूर केला आहे. त्याला सात वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. वास्तविक महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन अडीच हजार वर्षांपूर्वी प्रचलित, लोकप्रिय आणि मान्यताप्राप्त असलेली मराठी भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म. म . राजारामशास्त्री भागवत यांनी १८८५ मध्येच दाखवून दिले आहे.
तसेच यावर दुर्गा भागवत यांनी संशोधन करत विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी जुनी महाराष्ट्री संस्कृत पेक्षा जुनी आणि खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखविले आहे. इतकी मराठी भाषा जुनी आहे. दक्षिणेकडील ७ भाषांना आजवर अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेने देखील अभिजात भाषेचे निकष पूर्ण केले असून मराठी भाषेला अभिजात दर्जा तातडीने मिळण्याची आवश्यकता आहे, असे भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्र्यांनी अभिजात मराठीच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची ग्वाही दिल्यानंतरही उद्धव ठाकरे गटाचे आमदार बोलण्यासाठी परवानगी मागत होते. मात्र, अध्यक्षांनी त्यांना परवानगी दिली नाही.
त्यामुळे या सदस्यांनी गदारोळ केला. त्यावेळी भाजप सदस्य आशीष शेलार यांनी ज्यांचा पक्ष आहे त्यांना शिष्टमंडळात नेऊ. पण ज्यांच्या पक्षाची अजून नोंदणी झाली नाही अशांनाही शिष्टमंडळात घेऊन जाऊ, असा टोला त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांचे नाव न घेता लगावला.