पुणे । Pune
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. पुण्याचं एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार बोलताना म्हणाले, मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की पुण्याचं एक वेगळं असं ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथे झाला. त्यांचं बालपण देखील इथेच गेलं. आज ज्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा होती. तो सर्जिकल स्ट्राईक पहिल्यांदा महाराजांनी लाल महालामध्ये केला होता. इतर राज्य संस्थानं त्यांच्या नावानं ओळखली जातात. मात्र शिवाजी महाराजांनी जे राज्य उभं केलं ते हिंदवी स्वराज्य रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. याच पुण्यात टिळकांनी स्वराज्याची मशाल पेटवली, गुलामगिरीविरोधात लढा उभारला. पुण्यात दोन गट होते एक जहाल आणि मवाळ जहाल गटाचं नेतृत्व टिळकांनी केलं. स्वातंत्र्यात टिळकांचं मोठं योगदान आहे. टिळकांनी पत्रकारितेला आपलं शस्त्र बनवलं. पत्रकारितेवरचा दबाव त्यांनी झुगारून लावला. पत्रकारितेवर कोणाचा दबाव असता कामा नये या मताचे टिळक होते असं पवार यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दलही शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. लोकमान्य टिळक पुरस्कारांचे वेगळे महत्त्व होते. आत्तापर्यंत हा पुरस्कार इंदिरा गांधी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंग अशा यांना मिळाला आहे. या यादीत आता नरेंद्र मोदींचा समावेश झाला. त्याबद्दल त्यांचे मी अंतकरणापासून अभिनंदन करतो.. असे शरद पवार यावेळी म्हणाले.