
मुंबई | Mumbai
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना २४ डिसेंबरपर्यंत जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर कोण कोण ओबीसींमध्ये (OBC) २० वर्षांपासून आहेत आणि ओबीसींना आरक्षण कुणी दिले त्यांची नावे जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता मराठा-ओबीसी वाद वाढण्याची शक्यता आहे...
तर दुसरीकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मंत्री भुजबळ हे मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) दाखल केलेल्या याचिकेवर होणाऱ्या सुनावणीसाठी आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
यावेळी भुजबळ म्हणाले की, कायदेशीर मार्गाने मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. यामुळे अशा काही लोकांना एका बाजूने मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना घ्यायचे आणि ओबीसींमध्ये यायचे. आणि दुसऱ्या बाजूने जे ओबीसी आहेत, त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात लढून त्यांना ओबीसीतून बाहेर ढकलायचे, असा हा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरू आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. कायदेशीर आणि राजकीय लढाई आमची सुरू आहे, असे भुजबळांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमध्ये जाऊन सर्व प्रकारचे आरक्षण पाहिजे आहे आणि तेही ते म्हणतील तसे आरक्षण हवे आहे. एकाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले की त्याच्या पत्नीच्या १५० लोकांना आणि त्याच्या कुटुंबाच्या २०० लोकांना मिळेल. असे करून सगळेच आपोआप कुणबी झाले. आणि कुणबी झाले की मग ते ओबीसीत आले, मग त्यांना शिक्षणाचे नोकरी आणि राजकारणाचे सर्व हक्क मिळतील. एवढ्या ३७५ जाती आहेत. यात मराठा समाज आला, तर कुणालाच काही मिळणार नाही. आणि ओबीसी संपतील, असेही भुजबळांनी म्हटले.
तसेच मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. तुम्ही त्यांना वेगळे आरक्षण द्या. कायद्यात काही त्रुटी राहिल्या असतील, त्या दुरुस्त करा आणि सर्वोच्च न्यायालयात लढा. मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही मतदानही केले आहे. म्हणून त्यांना वेगळे आरक्षण द्यावे, पण आता ओबीसीतून सरसकट आरक्षणाची मागणी केली आहे, असेही भुजबळ म्हणाले.
बच्चू कडूंचा भुजबळांना विरोध
आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. मराठा कुणबी नाही तर कोण? पाकिस्तानातून आणि अमेरिकेतून मराठा समाज आला आहे का? मराठा हे कुणबीच आहेत. काही लोक मतांचा हिशोब करून आपली राजकीय पोळी भाजत आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. छगन भुजबळ अभ्यासू नेते आहेत. महात्मा फुले यांनी सांगितले आहे की, कुणबी, माळी, मराठा हे भाऊ-भाऊ आहेत. त्यांना वेगळे करू नका. अठरा पगड जातीतले सगळे मराठे आहेत. मराठे हे समूहवाचक शब्द आहेत ते कोण्या जातीचा नाही. मराठे कुणबीच आहेत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.