
नाशिक | Nashik
जालन्यातील अंबड येथे काल 'ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा' पार पडली. यावेळी बोलतांना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर भुजबळांच्या या टीकेला जरांगे पाटील यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद आज राज्यभरात उमटतांना दिसत आहे.
तर काल जरांगे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी भुजबळांना लक्ष्य करत त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सरकारकडे केली होती. यानंतर आता भुजबळांनी संभाजीराजेंना प्रत्युत्तर देत संभाजीराजे तुम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या गादीवर बसला आहात. त्यामुळे तुम्ही फक्त एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता? असा सवाल केला आहे. ते इगतपुरी (igatpuri) येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, "संभाजीराजे काल म्हणाले की, भुजबळ दोन समाजात वितुष्ट निर्माण करत आहेत त्यांना मंत्रिमंडळातून (Cabinet) काढून टाका. मी संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मान करतो. कारण, आमच्या हृदयात मागासवर्गीयांसाठी लढणारे राजर्षी शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही बसले आहात. तुम्ही कुठल्याही एका समाजाचे नाहीत, तर सर्वांचे आहात. मग, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलू शकता? असे भुजबळ यांनी म्हटले.
तसेच आरक्षणाच्या (Reservation) प्रकरणात तुम्ही पडायला नको होतं. सर्वांचे अधिकार शाबूत ठेवून कुणावरही अन्याय करू नये, ही अपेक्षा संभाजीराजेंकडून आहे. बीडमधील घरेदारे मी जाळली का? तेव्हा तर तुम्ही गप्प होता. बीडमधील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तुम्ही जायला हवं होतं. मला आमदारकी आणि मंत्रीपदाची काळजी नाही. तो लढेल गोरगरीबांसाठी लढेल. तुम्ही छत्रपती शाहुंच्या गादीवर बसता त्यामुळे सर्वांना न्याय द्या, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन भुजबळांनी संभाजीराजे छत्रपतींना केले.
पुढे ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना देखील माझी विनंती आहे की, त्यांनी देखील आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, आम्हाला सांगा ना आम्ही कुठे चुकलो? राज्यात काय चाललं आहे ते आम्हाला सांगा. त्याच्यावर विचार करा, आम्ही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो, दूर ढकलण्याची नाही. राज्यातील जे वेगवेगळे पक्ष असतील, समाज असतील किंवा विविध पदांवर काम करणारे लोक असतील त्यांच्याकडून माझी हीच अपेक्षा आहे की त्यांनी आमचं सुद्धा ऐकून घ्याव. मग आम्हाला सांगा आमच चुकलं कुठं? असेही भुजबळांनी म्हटले.