Thursday, April 25, 2024
Homeराजकीयकांदा निर्यातबंदीचा माजी आमदारांनी निषेध करावा - चारुदत्त सिनगर

कांदा निर्यातबंदीचा माजी आमदारांनी निषेध करावा – चारुदत्त सिनगर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

माजी आमदार मागील काही दिवसांपासून शेतकर्‍यांबाबत गळा काढत आहेत.

- Advertisement -

त्यांना शेतकर्‍यांविषयी जर मनापासून आत्मीयता असेल तर केंद्राने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीचा त्यांनी निषेध करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना केले आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने सोमवारी मागचा पुढचा विचार न करता तडकाफडकी कांदा निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. याचा फटका कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला असून शेतकर्‍यांमध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रचंड नाराजी वाढली आहे.

नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांची वैश्विक करोना महामारीमुळे आर्थिक स्थिती खालावली आहे. लॉकडाऊनच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जाणारी द्राक्षे शेतकर्‍यांनी मातीमोल भावात विकली त्यातून शेतकर्‍यांनी केलेला खर्च देखील सुटलेला नाही. दुसरीकडे डाळिंबावर मोठ्या प्रमाणात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हजारो हेक्टर डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या.

यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतीवृष्टीमुळे अनेक शेतकर्‍यांचे साठविलेले कांदे भिजले तर अनेक शेतकर्‍यांचे कांदे चाळीतच सडले आहेत.

त्यामुळे शिल्लक असलेल्या थोड्या फार चांगल्या कांद्यावर शेतकरी पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत असताना केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा अघोरी निर्णय घेऊन शेतकर्‍यांच्या जखमेवर अक्षरश: मीठ चोळले आहे.अशा परिस्थितीत कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार शेतकर्‍यांविषयी पुतना मावशीचे प्रेम दाखवून आपली प्रसिद्धी करून घेत आहेत.

मागील काही महिने लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे कांद्याला मागणी कमी असताना शेतकर्‍यांनी आपल्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी जो काही कांदा विकला तो कवडीमोल भावाने विकला आहे. आता कांद्याची मागणी वाढल्यामुळे कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढले असताना शेतकर्‍यांच्या पदरात काहीतरी पडण्यास सुरुवात झाली.

मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा शेतकर्‍यांच्या वतीने निषेध नोंदविला जात आहे. अशावेळी शेतकर्‍यांविषयी गळा काढणार्‍या राजकीय नेत्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा निषेध हा केलाच पाहिजे. त्यामुळे तालुक्याच्या माजी आमदारांना माझे आवाहन आहे की, शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा त्यांनी निषेध करावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या