
मुंबई । Mumbai
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर खोचक टीका केली होती. 'मी जर मनावर घेतलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल', असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
माझ्या बारामतीच्या एका दौऱ्यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहे. करेक्ट कार्यक्रम कुणाचा करायचा हे जनता २०२४ मध्ये ठरवेल. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवार देखील भेटणार नाही. माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. अजितदादा कधी रडतात तर कधी ८-८ दिवस फोन बंद करून पळून जातात, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी सत्तेत आली, तेव्हा सत्तेची फळे अजितदादांनी चाखली आहेत. तरीही पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला नाही. सत्तेपासून पैसा आणि पैसापासून सत्ता, असे त्यांचे राजकारण राहिले आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे बघायला हवे. ते ओबीसींचे मारेकरी आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
लोकायुक्त कायदा हा महत्त्वाचा आहे. ज्यांनी ५० वर्षे सत्तेपासून पैसा कमविला. त्यांना लोकायुक्ताची भीती वाटते आहे. घोटाळ्याचे बॉम्ब आमच्याजवळही आहे. पीएमआरडीएमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किती जमिनी ग्रीनबेल्टच्या यलोबेल्टमध्ये केल्या एवढे जरी मांडले तरी भरपूर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.