
मुंबई | Mumbai
काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पनवेल येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे समृद्धी महामार्गावरून जात असताना त्यांना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी अडवून त्यांच्याशी हुज्जत घातली होती.
यानंतर मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास टोल नाक्यावर जाऊन टोलनाक्याची तोडफोड केली होती. त्यावरून भाजपने मनसेवर आधी रस्ते बांधायला आणि उभारायला शिका, अशी टीका केली होती. या टीकेला राज ठाकरे यांनी काल (दि.१६) रोजी प्रत्युत्तर देत भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिकावे, असे म्हणत टीका केली होती. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बावनकुळे म्हणाले की, "१९८४ मध्ये लोकसभेत भाजपच्या (BJP) दोन जागा होत्या. आज देशात ३०३ जागा झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. एवढं बहुमत गेल्या २० वर्षात कुठल्याही पक्षाला मिळाले नव्हते. पक्ष वाढवण्यासाठी विश्वास निर्माण करायला लागतो, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणासाठी काम करावं लागतं. पक्ष उभारणीसाठी आयुष्यातील १८-१८ तास द्यावे लागतात. संवाद करावा लागतो, प्रवास करावा लागतो, सर्व समाज, धर्मात एक जागा निर्माण करावी लागते." असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, "आम्ही कुठल्याही पक्षातील लोक जबरदस्ती आणत नाही, आम्ही कोणाच्या घरी जात नाही. पण आम्ही काही संन्यासी नाही, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत. भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून कोणी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली, तर आमचा दुपट्टा तयार आहे. राज ठाकरे यांनी उलट तारीफ केली पाहिजे, पक्षाचा विस्तार हा प्रवास आणि संवादाने झाला आहे. आमची विश्वासार्हता निर्माण झाली आहे, आम्ही कधीच फोडाफोडीचे राजकारण केले नाही. उलट आमच्याशी बेईमानी झाली. फडणवीस अष्टपैलू नेते असल्याचा विश्वास वाटल्याने अनेक जण आमच्या पक्षात येतात." असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.