नागपूर | Nagpur
'मोदी नावाचे वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील', असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे...
आज चंद्रशेखर बावनकुळे यांची काँग्रेस पक्षातून निलंबित झालेले आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी भेट घेतली. या भेटीनंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
बावनकुळे म्हणाले की, मोदीजींचा एकेरी उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. मोदीजींना या देशाने पसंती दिली आहे. मोदीजींचे वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील. उद्धव ठाकरेंना मोदींची भीती वाटतेय.', असा घणाघात बावनकुळे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेतृत्वाचा अभाव आहे, संधी मिळाली होती पण त्यात ते अपयशी ठरले. त्यांच्या काळात 4 हजार कोटी कंपन्यांनी खाऊन टाकले. खोटं बोलू पण रेटून बोलू अशी उध्दव ठाकरे यांची अवस्था झाली असल्याचेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानी लोकांना माहित आहे शिवसेना कुणाची आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानी जनतेला प्रमाणपत्र मागावे लागत आहे. त्यांना भारतीय लोकांवर विश्वास नाही.
उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्त्व कसे सोडले? याचे प्रमाणपत्र देश आणि महाराष्ट्राने दिले आहे. दररोज लोकं त्यांना सोडून जात आहेत. मुख्यमंत्री बदलले जातील अशी अफवा संजय राऊत आणि महाविकास आघाडीकडून पसरवली जात आहे. संजय राऊत आता महाविकास आघडीचे वाटोळे करतील, असे देखील त्यांनी म्हटले आहे.