नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात हे पाहावे लागेल

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात हे पाहावे लागेल

पुणे

नाथाभाऊंनी पक्ष सोडून जायला नको होते. पक्षात त्यांना योग्य तो सन्मान मिळत होता. त्यांच्या नाराजीवर बसून काही ना काही मार्ग निघाला असता, तरीही ते गेले. जिथे जातील तिथे त्यांनी चांगलं काम करावं, अशा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत व्यक्त केली. नाथा भाऊंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात हे पाहावे लागेल, दोन वाजताचा पक्षप्रवेश चार वाजेपर्यंत का लांबला, याचं उत्तर आधी जयंत पाटलांनी द्यावं असेही ते म्हणाले.

पाटील आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, नाथा भाऊंना नेमकं काय द्यायचं हे अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरलेलं नाहीये. तुमचे समाधान होईल असे देऊ असं त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर नाथाभाऊ नरिमन पॉईंट मधल्या फ्लॅटवरून बळेबळे बाहेर पडले. समाधान होण्यासाठी लिमलेटची गोळी ही देतात आणि कॅडबरीही देतात. जे काही मिळेल त्यामुळे नाथाभाऊ समाधानी होतील का? की काही पर्यायच उरलेला नाही म्हणून जे मिळेल ते स्वीकारतील? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. नाथाभाऊ समाधानी होतात की नाही, हे येणारा काळ ठरवेल असे पाटील म्हणाले.

नाथाभाऊंनी एकट्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं योग्य नाही.

देवेंद्र फडणवीस सर्व प्रकारच्या थपडा खातात परंतु राज्याच्या आणि पक्षाच्या हितासाठी शांत राहतात. त्यांचा शांतपणा हा कमकुवतपणा नाही तर मनाचा मोठेपणा आहे. नाथाभाऊंनी एकट्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं योग्य नाही. भारतीय जनता पार्टीत जे निर्णय होतात ते सामूहिक पद्धतीने होतात. त्यामुळे एकाला टार्गेट करायचं आणि इतरांना तुमचा काही दोष नाही म्हणायचं ही नाथाभाऊंची भूमिका बरोबर नाही. देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअर केलं आहे की अश्लील बोलल्यावरही विनयभंगाची केस दाखल होणार नाही का? एकनाथ खडसे यांच्या बाबतीतलं अर्धसत्य फडणीस यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या १० हजार कोटीच्या पॅकेजबाबत बोलताना पाटील म्हणाले, कधी नव्हे ते उद्धव ठाकरे बाहेर पडले होते. भरीव मदत मिळेल असं वाटलं होतं, पण सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली. सरकारच्या अपुऱ्या मदतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत, अशी टीका केली

जीएसटीवरूनही पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पाटील म्हणाले, की केंद्राकडून जीएसटी भरपाईपोटी किती रक्कम मिळणार हे आधी ठरवा. याबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. कुणी म्हणतंय 38 हजार कोटी कोणी म्हणतं 60 हजार कोटी. पण जीएसटी भरपाई अन् शेतकरी मदत ही तुलना बरोबर नाही, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com