मुंबई | Mumbai
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला असं अजब वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलं आहे. कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
प्रसाद लाड बोलताना म्हणाले, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल. पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला,”.
दरम्यान त्यांच्या तोंडून कोकण शब्द बाहेर येताच बाजूला असलेल्या पदाधिकाऱ्याने ‘महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला,’ अशी माहिती प्रसाद लाड यांना पुरवली. त्यानंतर, लागलीच त्यांनी आपल्या वाक्याची सारवासारव करत ‘महाराजाचं बालपण रायगडावर म्हणजे कोकणात गेलं,’ असं म्हणाले. ‘रायगडावरच त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि तेथून सुरुवात झाली,’ असं ते पुढे म्हणाले.
राष्ट्रवादीने ट्वीट करत प्रसाद लाड यांचा तो व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असंही त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.