मुंबई । Mumbai
मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांचा ५ जून रोजीचा अयोध्या दौरा (ayodhya tour) तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. परंतु राज यांच्या या निर्णयावर भाजपचे (BJP) खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
‘माफी न मागणाऱ्या राज ठाकरेंनी जुन्या जखमा ताज्या केल्या आहेत. राज ठाकरे दुर्देवी व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे एक संधी होती, तीही हुकली. त्यांनी इथल्या लोकांची, योगींची, मोदींची माफी मागितली असती तर उत्तर प्रदेशच्या लोकांचा राग कमी झाला असता. पण माफी न मागता त्यांनी जखम पुन्हा ताजी केली आहे.’ अशा शब्दात बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तसेच, राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाला असला तरी माझे ५ जूनचे कोणतेही कार्यक्रम रद्द होणार नाहीत, आम्ही ५ जून रोजी अयोध्येमध्ये शरयू नदीत स्नान करणार आहोत. तेथील साधू-संतांसोबत आम्ही पूजा-पाठही करणार आहोत,’ असंही बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा का केला स्थगित?
मिळालेल्या माहितीनूसार, राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राज ठाकरे यांना प्रकृतीच्या कारणास्तवच आपला पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतावे लागले. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्याबाबतीत शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच राज ठाकरे दौऱ्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते.