Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या...

पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या…

मुंबई | Mumbai

भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) मुद्दा उचलून धरला आहे.

- Advertisement -

मुंबईतील (Mumbai) भाजपच्या मुख्यालयात पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ओबीसी आरक्षणाबरोबरच पंकजा यांनी राज्यातील इतर मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तुमच्या महाराष्ट्रात काय चाललं आहे?

‘महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून संपूर्ण देश महाराष्ट्राकडे बघत असतो. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याचा विचार केला आणि राज्याच्या बाहेर आम्ही कुठे गेलो तर पूर्वी लोक महाराष्ट्राचं उदाहरण देऊन काम करत होते. पण आता लोक मला प्रश्न विचारतात तुमच्या महाराष्ट्रात काय चाललं आहे?’ अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

‘ओबीसी आरक्षणावरूनही सरकारला धारेवर धरले. ओबीसींचं आरक्षण रद्द झालं. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेलं आहे. इम्पिरिकल डेटा देण्यासाठी मागणी होत असताना १५ महिन्यात ७ वेळा तारखा घेण्यात आल्या. वेळकाढूपणा करण्यात आला. या सरकारने ओबीसींच्या पाठित खंजीर खुपसलं आहे. निवडणुकीच्या अध्यादेशासाठी इम्पिरीकल डेटा महत्त्वाचा आहे. मात्र, हा अध्यादेश हा केवळ दिखाऊपणा आहे.’ तसेच ‘ओबीसी आंदोलनात सुसुत्रता आणायला हवी. एका छत्राखाली सगळ्यांनी यायला हवं. प्रकाश शेंडगे यांना शुभेच्छा. पण सगळ्यांनी एकत्र सरकारवर दबाब टाकायला हवा, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.

…म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला

तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावरून देखील पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळलेला आहे. एखाद्या संघटनेच्या सगळ्या मागण्या मान्य करता येत नाहीत. पण त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. सरकारने चर्चेसाठी विलंब केल्यामुळे हा संप चिघळला’, असं त्या म्हणाल्या.

मला कशाचीही अपेक्षा नाही

पंकजा मुंडे यांनी आपल्याला कशाचीही अपेक्षा नसल्याचे सांगितले. मी लोकांमध्ये असून राज्यभर फिरत आहे. कुठल्या पदाने काही होणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच पंकजा यांनी पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत टिप्पणी केली होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्याला कसलीही अपेक्षा नसल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या