मुंबई | Mumbai
भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंबद्दल (Supriya Sule) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. यासोबतच त्यांच्या माफीनाम्याची मागणीही होत होती. यावरूनच आता चंद्रकांत पाटलांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहित आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटलांनी काय म्हटलंय पत्रात?
आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Hadicap, सावली, आई, संवेदना आणि वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेच महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल आणि महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दु:ख नाही.
माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन खोचक टीका केली होती. ‘कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या,’ असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका केली होती.