“माझा घसा ठिक होऊ द्या, मग…”; नारायण राणेंचा पुन्हा हल्लाबोल

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर राणेंना झालेली अटक आणि सुटका, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रा (Jan Ashirvad Yatra) आजपासुन रत्नागिरीत सुरु झाली. यावेळी नारायण राणे यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Govt) हल्लाबोल केला.

नारायण राणे यांनी यावेळी एका अ‍ॅसिड प्रकरणाचा (Acid case) दाखला दिला आहे. नाव न घेता नारायण राणे यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाविषयी राजकीय वर्तुळात प्रश्न निर्माण झाला आहे. ते म्हणाले की, कसले भाषणं करता, माझा घसा ठिक होऊ द्या, मग मी सोडणार नाही. काय करायचे ते करा. जुन्या गोष्टी काढत आहेत, काढा ना. आम्हाला देखील जुन्या गोष्टी माहिती आहेत. आपल्याच बंधुंच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कोणी कोणाला सांगितले? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकले. ही प्रकरणे मी टप्प्याटप्प्याने काढणार आहे’ असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.

वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं होतं. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, वरून सरदेसाई आमच्या घरावर येऊन हल्ला करतो. त्याच्यावर अजून कारवाई केली नाही. यापुढे आमच्या घरावर जो चालून येईल त्याला परत जाता येणार नाही. वरून सरदेसाई कसा येतो आणि परत जातो आम्ही पाहतोच. आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, तो नातलग आहे. काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट. कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेवढा त्याला आहे. आता परत आला तर परत नाही जाणार, आमच्या घरावर कोणी येईल, आम्ही नाही सोडणार. आणि तो वरुण येऊ देच, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे.

तसेच राणे पुढे म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रेला भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. रात्री एकेक वाजेपर्यंत लोक ६ ते ७ तास वाट पाहत थांबले होते. हे भाग्य यांच्या नशिबी नाही. पूर्वी घडलेल्या घटनेवर पत्रकारमित्रांनी प्रश्न विचारला. बोललो मी. त्यावेळी मी तिथे असतो तर आवाज आला असता, असतो तर ना. पण दरोडेखोराला अटक करतात तसे केंद्रीय मंत्र्याला अटक करायला २०० पोलिस. काय पराक्रम आहे. महाराष्ट्रात सर्व जनता त्रस्त आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. चिपळूण, महाड पूरस्थितीत भरपाई मिळाली नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *