<p><strong>पुणे l Pune </strong></p><p>देशात नव्या कृषी कायद्यांवरून ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. गेले २९ दिवस दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे, या कायद्यांच्या समर्थकांची देखील संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज भाजपचे आज राज्यभर ‘शेतकरी संवाद अभियान’ सुरु आहे.</p>.<p>माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारची बाजू मांडताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मांजरी बुद्रूक येथे संवाद यात्रेत संबोधित करताना नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगितले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.</p>.<p>मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करणार असल्याचे बोलले होते. त्यावेळी नुकसान झालेल्या भागाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा देखील घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार तर मुख्यमंत्र्यांच्याही पुढे गेले. त्यांनी बागायतदारांना दीड लाख रुपयांची मदत देऊ असे घोषित केले होते. मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.याचमुळे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे , अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.</p><p>तसेच, 'आम्ही केलेल्या कर्जमाफीला नावे ठेवत राज्य सरकारने कर्जमाफीची योजना तयार केली. पण त्याचा फारसा उपयोग शेतकऱ्याला झालेला नाही. मात्र आमच्या काळात जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा जवळपास ४२ लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी २९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला होता. यांनी मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला. आमच्या काळात शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आले तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. पण आज सरकार शेतकऱ्याचा विचार कऱणारे,त्यांची भूमिका मांडणारे असे कुणीही दिसत नाही. भाजपाने मागील पाच वर्षात सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले होते, असहा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना सहा आणि आठ हजार रुपये घोषित केले आणि तेदेखील पोहोचले नाही. शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे," असा संताप फडणवीसांनी व्यक्त केला.</p>