Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयस्थानिक निवडणुका पुढे ढकला; भाजपची मागणी

स्थानिक निवडणुका पुढे ढकला; भाजपची मागणी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यात सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी–नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) जाहीर केलेला ९२ नगरपालिका, ४ नगर पंचायती आणि १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भाजपने (BJP) केली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची भेट घेऊन पक्षाच्या मागणीचे निवेदन दिले.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय (OBC Political Reservation) होऊ नयेत, अशी भाजपची (BJP) भूमिका आहे. निवडणुका (Election) पुढे ढकलल्यास हे आरक्षण पुन्हा लागू करण्यास सवड मिळेल, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commision) दोन दिवसांपूर्वी ९२ नगरपालिका ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार २० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधी निवडणूक कार्यक्रम असेल. हा सर्व पावसाचा (Rain) कालावधी आहे.

सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांनी मतदान करणे अवघड होणार आहे.

त्यामुळे आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी विनंती आम्ही राज्य निवडणूक आयुक्तांना केली असून त्यांनी शहरानुसार फेरआढावा घेण्याचे आश्वासन दिल्याचे पाटील म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) जाहीर करताना पावसाचा अंदाज घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकालात म्हटले आहे. आयोगाने पावसाच्या आकडेवारीचा विचार केला असला तरी वस्तुस्थितीचा विचार करावा, असे आमचे म्हणणे आहे.

२०१९ आणि २०२१ अशी दोन वर्षे कराड शहराचा बहुतांश भाग काही आठवडे पाण्याखाली होता. तर गेल्या वर्षी कागल शहराचा १५ दिवस पावसामुळे परिसराशी संपर्क तुटला होता. ही दोन उदाहरणे ध्यानात घेतली तर पावसाच्या बाबतीत वस्तुस्थिती ध्यानात घेण्याची गरज आहे, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, निवडणूक आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आदींचा समावेश होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या